युती-आघाडीचे दावे-प्रतिदावे ; युतीला ४५ तर आघाडीला २५ जागांवर मिळणार विजय !

Foto

मुंबई:  लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर विविध एजन्सींनी एक्झिट पोल जाहीर केला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक जागा युतीला मिळणार आहेत, असे असले तरी 2014 पेक्षा जास्त म्हणजे 48 पैकी 45 जागांवर विजय मिळणार असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी केला आहे. तर काँग्रेस आघाडी 25 जागांवर विजयी होणार असल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी केला आहे. त्रकारांशी बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले की, देशातील आणि राज्यातील मतदारांनी मोदींच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास ठेवला त्याबद्दल आभार व्यक्त करतो. एक्झिट पोलच्या माध्यमातून जी काही आकडेवारी येत आहे त्यावरुन भाजपा बहुमतात येणार आणि ३०० चा आकडा पार करणार असा विश्वास आहे. देशातील जनतेने विरोधकांना नाकारले आहे हे सिद्ध झाल्याचे त्यांनी सांगितले.
 
तसेच महाराष्ट्रात शिवसेना-भाजपा युतीला ४५  जागा मिळतील, काँग्रेस-राष्ट्रवादीला दोन आकडी संख्याही पार करता येणार नाही. जे चित्र लोकसभा निवडणुकीत दिसले तेच विधानसभा निवडणुकीतही दिसेल. निवडणुकीत मोठा भाऊ अथवा छोटा भाऊ असे काही नाही. शिवसेना-भाजपा युतीमुळे४८ मतदारसंघात मोदीच उभे आहेत म्हणून मतदारांनी मतदान केले आहे. आमची मने मिळाली हेच विधानसभेत पुन्हा दिसेल असा दावाही रावसाहेब दानवे यांनी केला. दरम्यान उत्तर प्रदेशात सपा-बसपा आघाडीमुळे मतांमध्ये फूट पडेल पण जास्त परिणाम होणार नाही.  एक्झिट पोलच्या आकडेवारीवरुन देशातील जनतेचा कौल मोदींनाच असल्याचे दिसत असल्याचे रावसाहेब दानवेंनी सांगितले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला 22 जागा, शिवसेनेला १८ जागा मिळाल्या होत्या तर राष्ट्रवादी काँग्रेसला ४  जागा तर काँग्रेसला २  जागा्ंवर समाधान मानावे लागले होते.